Just another WordPress site

फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री फडणवीस हेच चालवतायेत- संजय राऊत

मुंबई: मी तुरुंगात असताना राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून केलेला उल्लेख राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मी तुरुंगात असताना राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मी त्या निर्णयांचं स्वागत करतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. मी तुरुंगात असताना मला जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचे, तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरीबांना घरं देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते. ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती. पण या सरकारने म्हाडाला पुन्हा अधिकार दिले, असे संजय राऊत यांनी म्हटले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा कौतुकमिश्रीत सूर पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

काल न्यायालयाने ज्या प्रकारचा निकाल दिला त्यामुळे देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. मला ईडी किंवा अन्य कोणाविषयीही बोलायचे नाही. त्यांनी कारस्थान रचलं असेल, त्यामध्ये त्यांना आनंद मिळाला असेल तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझ्या मनात कोणाविषयीही तक्रार नाही. मी आणि माझ्या पक्षाने जे भोगायचं होतं, ते भोगलं आहे. माझ्या कुटुंबाने खूप काही गमावले आहे. पण मी या गोष्टींचा स्वीकार करतो, अशा गोष्टी आयुष्यात घडतात. पण आजपर्यंतच्या इतिहासात देशाने अशाप्रकारचे सूडबुद्धीचे राजकारण कधी पाहिले नाही. आपल्या देशात दुश्मनांनाही चांगल्या पद्धतीने वागवलं जातं. तरीही मी या सगळ्याचा स्वीकार करतो. मी ईडी किंवा कोणत्या यंत्रणेला दोष देणार नाही. प्रत्येकाला चांगलं काम करण्याची संधी मिळते, त्यांनी चांगलं काम करावं, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!