Jagannath Temple : इंदिराजींना ज्या मंदिरात प्रवेश नाकारला, त्या मंदिरात गांधी परिवारातील व्यक्तींना आजही प्रवेश बंदी, नेमकं कारण काय?
सध्या आपल्या देशात लोकशाही आहे. प्रत्येक जण त्याला हवं ते करू शकतो. मात्र, असं असलं तरी इथला मुळं धर्म हिंदू आहे आणि या सनातन धर्माच्या नियमांचं पालन आजही केलं जातं. कोणी कोणत्या देवतेची उपासना करायची, भक्ती करायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. देशातील बहुतांश हिंदू मंदिरं सर्वधर्मियांना दर्शनासाठी खुली आहेत. मात्र, या लोकशाही प्रधान देशात एक मंदिर असंही आहे, जिथं हिंदूव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. वाटलं ना आश्चर्य ! याच मंदिराविषयी जाणून घेऊ.
हायलाईट्स
१. देशातील बहुतांश मंदिरं सर्वधर्मियांना दर्शनासाठी खुली
२. जगन्नाथ मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली होती
३. इंदिरा गांधींना नाकारला होता जगन्नाथ मंदिरात प्रवेश
४. सगळ्या गैर हिंदूना भगवान जगन्नाथ मंदिरात प्रवेश निषिध्द
भारतातील चारधाम ही सर्वांत पवित्र मानली गेलेली यात्रा स्थळं आहेत. या चार धामांपैकी एक असलेल्या ओडिशाच्या पुरीचे जगन्नाथ मंदिर त्याच्या अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली होती, असं सांगितल्या जाते. प्रत्येक हिंदूला आयुष्यात एकदा तरी या जगन्नाथ मंदिराला भेट द्यायची इच्छा असते. इथं फक्त हिंदूच नाही तर जगभरातून या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक आणि भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाट्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो. एवढेच नाही तर याशिवाय या मंदिराशी संबंधित अशा अनेक चमत्कारिक गोष्टी आहेत, ज्या येथे भेट दिल्यानंतरच अनुभवता येतात. हे मंदिर भारताचा पुरातन वारसा असून या मंदिराला केवळ धार्मिक महत्व नाही तर याचं स्थापत्य हा जगभरात कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय आहे. मात्र या मंदिरात तुम्हाला दर्शनासाठी प्रवेश करायचा तर तुम्ही हिंदू असणं गरजेचं आहे. हो, तुम्ही बरोबर वाचताय. तुम्ही हिंदू नसाल तर या मंदिरात तुम्हाला प्रवेश मिळत नाही. मग तुमचं समाजात कितीही नाव असू देत, तुम्ही कितीही श्रीमंत असू देत, एवढंच काय तुम्ही कितीही उच्चपदस्थ असाल. मात्र, तुम्ही हिंदू नसाल तर या मंदिरात प्रवेश मिळणं अशक्य आहे. याच नियमाला धरून अगदी भारताचे राष्ट्रपती कोविंद यांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता. यापूर्वीही गांधी कुटुंबालाही हिंदू नसल्याच्या कारणानं या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. १९८४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या मंदिरात प्रवेश मिळू शकला नाही. कारण, त्यांचं गांधी आडनाव जरी हिंदू असलं तरी त्यांनीन पारशी असलेल्या फिरोज गांधीशी लग्न केल्यानं त्या पारशी बनल्या होत्या. याच कारणामुळे राहुल आणि प्रियंका गांधी यांनाही या मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळत नाही. राहुल गांधी हे त्यांच्या मवाळ हिंदुत्वाच्या राजकारणासाठी ओळखले जातात. म्हणूनच त्यांनी काही वर्षांपूर्वी केदारनाथला भेट दिली होती. प्रत्येक निवडणुकीत ते मंदिरांना भेट देतात. मात्र, त्यांनी जगन्नाथ मंदिराला भेट देण्याचा विचार आतापर्यंत कधीही केला नाही. या मंदिर प्रशासनाच्या मते, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील पारशी आहेत. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाऊ शकत नाही. खरं सांगायचं तर फक्त गांधी कुटूंबातील व्यक्तींनाच या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी आहे, असं नाही. तर सर्व गैर-हिंदूंना देखील इथे येण्यास बंदी आहे. १९७७ साली जगप्रसिध्द इस्कॉन चळवळीचे संस्थापक भक्ती वेदांत स्वामी प्रभूपद यांनी पुरीला भेट दिली असता त्यांच्या भक्तांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. गैर हिंदूना मंदिरात प्रवेश न देण्याचं कारण असं सांगितल्या जातं की, एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे १४४ वर्षे बंद होते. जगन्नाथ मंदिर लुटण्यासाठी आणि मूर्तींची विटंबना करण्यासाठी हल्ल्यांचे कारण अहिंदूच होते. त्यामुळं गैरहिंदूंना या मंदिरात प्रवेश मिळत नाही. मंदिरावरील हल्ल्यांचा संपूर्ण इतिहास आणि मूर्ती नष्ट करण्याचे प्रयत्न ओडिशा सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर दिले आहेत.